https://youtu.be/GpfnA04ygcI?si=oTmdPBv67zzWih6S
मुरबे जिंदाल बंदर प्रकल्पाविरोधात तीव्र लढयाचा निर्धार — जनसुनावणीपूर्वीच जिंदाल व प्रदूषण मंडळावर धडक देण्याची तयारी
पालघर : मुरबे येथील प्रस्तावित जिंदाल बंदर प्रकल्पाविरोधात आगामी जनसुनावणीपूर्वीच संघर्ष उभा राहणार आहे. मुरबे जिंदाल बंदर विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय संघटना व संस्थांच्या संयुक्त बैठकीत या प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. पुढील आठवड्यात होणाऱ्या जनसुनावणीपूर्वी बोईसर येथील जिंदाल कारखाना किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक देण्याची रणनीती यावेळी आखण्यात आली आहे.
या बैठकीत मुरबे बंदर प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली व जनसुनावणी पूर्वी देण्यात आलेली पर्यावरणीय प्रभाव अहवाल अपूर्ण व चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचा आक्षेप देखील घेण्यात आला. तसेच बंदरामुळे परिसरावर होणाऱ्या गंभीर पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक धोक्यांची चर्चा झाली. जनसुनावणी रद्द किंवा स्थगित व्हावी यासाठी आतापर्यंत झालेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी देण्यात आली. आगामी काळातही जनसुनावणी थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे ठरले. मात्र केवळ प्रशासकीय पातळीवरील प्रयत्न न करता, जमीन पातळीवरील तीव्र लढा उभारण्याची गरज अनेक वक्त्यांनी अधोरेखित केली.
बैठकीत सांगण्यात आले की, यापूर्वी जिंदाल कंपनीने नांदगाव येथे बंदर उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ग्रामस्थ व स्थानिकांच्या प्रखर विरोधानंतर प्रशासनाला प्रस्ताव मागे घ्यावा लागला. “आता हीच एकजूट दाखवून तीव्र आंदोलनाद्वारे जिंदालला मुरबे बंदर प्रकल्पही रद्द करायला भाग पाडू,” असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कंपनीने केवळ बंदराचे ठिकाण नांदगाववरून मुरबे येथे हलवून नावापुरते बदल केला असल्याचेही वक्त्यांनी निदर्शनास आणून दिले.
बंदराचे प्रचंड प्रमाण — स्थानिक गावांना मोठा धोका :
एकूण १०६५ एकर क्षेत्रावर हे बंदर उभारण्यात येणार आहे. बंदरासाठी मुरबे व खारेकुरण गावांतील जमिनी रस्ता व रेल्वे जोडणीसाठी बाधित होतील. हा संघर्ष सर्वसमावेशक आणि निस्वार्थ असावा, तसेच कोणत्याही परिस्थितीत एकजुटीला तडा जाऊ नये, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
सरकारच्या शिपिंग कॉरिडॉर योजनेअंतर्गत संपूर्ण समुद्रकिनारा बंदरांसाठी खुला करण्यात येणार असून यामुळे पारंपरिक मासेमारी पूर्णतः संपुष्टात येईल, मच्छीमार समाज उध्वस्त होईल व किनारी गावांवर याचे गंभीर परिणाम होतील, अशी भीती व्यक्त झाली.
बंदरात एकूण १६ बर्थ तयार करण्यात येणार असून सुमारे १३४.७ दशलक्ष टन वार्षिक मालवाहतुकीचे लक्ष्य आहे. परिणामी दररोज हजारो वाहने या परिसरातून धावतील. कोळसा, क्रूड ऑइल, सीएनजी, एलपीजी, स्टील यांसह विविध घातक मालाची वाहतूक होणार असल्याने पर्यावरणीय प्रदूषण व आरोग्यधोके निर्माण होतील.
दक्षिणेकडे १०,००० मीटर व उत्तरेकडे १३०० मीटर लांबीचे तरंग प्रतिबंधक बंधारे उभारले जाणार असून याचा परिणाम सातपाटीपासून नांदगाव-नवापूरपर्यंतच्या किनाऱ्यावर दिसून येईल, अशी भीती यावेळी मांडण्यात आली.
प्रचंड ड्रेजिंग व समुद्रगाळ टाकण्यामुळे किनाऱ्याला धोका :
बंदर परिसरात ३७ दशलक्ष घनमीटर इतके ट्रेझिंग (दुर्गंधीयुक्त गाळ उपसा) होणार आहे. यापैकी ३१ दशलक्ष घनमीटर गाळ समुद्रगाळाद्वारे, तर ६ दशलक्ष घनमीटर गाळ विशेष ठिकाणी समुद्रात टाकला जाणार आहे. या प्रक्रियेचा थेट परिणाम मुरबे सहित किनारी गावांवर होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.यासाठी सर्वंकष पर्यावरणीय अभ्यासाची मागणीही यावेळी करण्यात आली.
२८० एकर क्षेत्रावर साठवण, रेल्वे-जोडणी, रस्ते व पाइपलाइन सुविधा उभारण्यात येणार आहेत. बंदराला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी चार पदरी रस्ता उभारला जाणार असून भू संपादन व अन्य मार्गाने त्याचेही परिणाम स्थानिक ग्रामस्थांना भोगावे लागणार आहेत.
ग्रामस्थांना ‘सीएसआर’द्वारे फोडण्याचा प्रयत्न?
काही वक्त्यांनी ग्रामस्थ व स्थानिक स्वराज्य संस्थांना वश करण्यासाठी कंपनी सीएसआर निधीचा वापर करीत असल्याचा आरोप केला व तो तात्काळ थांबविण्याची मागणी केली. वाढवण, मुरबे आदी बंदरांमुळे पूर्वेकडील डोंगर नष्ट होण्याची भीतीही व्यक्त झाली.
बैठकीत वक्त्यांनी यापूर्वीच्या नांदगाव बंदरविरोधातील लढ्याप्रमाणेच सशक्त, एकजुटीची भूमिका घेण्याचे आवाहन केले. “हे बंदर खाजगी असून खाजगी बंदराचा शिरकाव होऊ देऊ नये,” असा ठाम सूर यावेळी व्यक्त झाला. धरणे, निदर्शने व दबावतंत्राच्या मार्गाने जिंदाल कंपनी व सरकारवर दबाव आणण्याचे ठरले, आणि सर्व उपस्थितांनी त्यास एकमुखी सहमती दिली. काही मोजक्या व्यक्ती बंदराच्या बाजूने बोलत असल्यास त्यांचा प्रभाव तात्काळ रोखण्याची सूचना करण्यात आली.
बैठकीला मोठी उपस्थिती :
या महत्त्वपूर्ण बैठकीस मुरबे ग्रामपंचायत सरपंच मोनालीसा तरे, कुंभवली सरपंच तृप्ती संखे, नांदगाव सरपंच समीर मोरे, सातपाटी सरपंच सीमा भोईर. आलेवाडी सरपंच राजू वाडीकर, नवापूर सरपंच अंजली बारी , उपसरपंच,महाराष्ट्र मच्छीमार सहकारी संघाच्या चेअरमन व शिवसेना उपनेत्या ज्योती मेहर, नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष जयवंत तांडेल, डॉ. मंगेश सावंत,वाढवणविरोधी युवा संघर्ष समितीचे मिलिंद राऊत, भूषण भोईर, स्वप्निल तरे, सातपाटी मच्छीमार संस्थेचे माजी चेअरमन राजन मेहेर, मुरबे जिंदाल बंदर विरोधी संघर्ष समितीचे प्रमोद आरेकर, सचिन पाटील,जितेंद्र मेर, जयेश गावड, राकेश तरे, कुणबी सेनेचे अविनाश पाटील, मनसेचे धीरज गावड, मच्छीमार नेते अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे माजी अध्यक्ष अशोक तांडेल, मानेंद्र आरेकर,तसेच विविध मच्छीमार सहकारी संस्थां,राजकीय पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 एकूणात, मुरबे बंदर प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला असून जनसुनावणीपूर्वीच जिंदाल व शासनावर दबाव आणण्यासाठी व्यापक आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.