**डहाणू-तलासरीतील आदिवासी गावांना महामार्गाशी थेट जोडणीसाठी खासदार डॉ. सवरा यांची केंद्राकडे
नवीन रस्त्याची मागणी**
डहाणू-तलासरी पट्ट्यातील आदिवासी गावांना राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडण्यासाठी नवीन रस्ता विकसित करावा, अशी मागणी खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
डहाणू आणि तलासरी तालुक्यातील बोर्डी, घोलवड, कोसबाड, रामपूर, भिनारी, जांबुगाव, झाई, बोरीगाव, जलवाई, आसवली, खुणवडे, नागबंध, नंगणकस तसेच डोंगरीपाडा (डहाणू) व परसपाडा, डोंगरीपाडा (तलासरी) ही गावे सध्या राष्ट्रीय महामार्गाची थेट जोडलेली नाही.
या भागातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग ४८ वर पोहोचण्यासाठी चारोटी, तलासरी किंवा भिलाडमार्गे सुमारे ४२ ते ४८ किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढून आरोग्य सेवा, शिक्षण आणि इतर अत्यावश्यक सुविधांसाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
स्थानिक रहिवाशांच्या मागणीचा विचार करून खासदार डॉ. सवरा यांनी , आसवली (घाट मार्गातून उत्तरेकडील वळण) – करजगाव (पाटीलपाडा) – धामणगाव – सवणे – वडवली , अंतर: आसवली ते करजगाव (पाटीलपाडा): अंदाजे ५ ते ७ किमी व धामणगाव ते वडवली: अंदाजे ७ ते ९ किमी असे नवीन मार्ग सुचवले आहेत—
हा मार्ग विकसित झाल्यास—
ही आदिवासी गावे थेट महामार्गाशी जोडली जातील तसेच
वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवे सुमारे १३ किमी अंतरावर उपलब्ध होईल व राष्ट्रीय महामार्ग ४८ सुमारे १८ किमी अंतरावर येईल परिणामी
आरोग्य, शिक्षण व बाजारपेठांपर्यंत पोहोच सुलभ होईल असे सवरा यांनी म्हटले आहे.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रस्तावाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती खासदार डॉ. सवरा यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.